विरगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशनच्या वतीने प्रशिक्षण
इगतपुरी ( प्रतिनिधी )
तापमानात होत असलेली वाढ अन बदललेले निसर्गचक्र पर्यावरणाचा होत असलेला असमतोल, अनियमित पर्जन्यमान अशा अनेक कारणांनी निसर्ग प्रत्येकाला अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. भूजलाची घटती पातळी अतिशय चिंताजनक असून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. पाणी वापरावर कुणाचे नियंत्रण राहिले नसल्याने समस्यांना तोंड दयावे लागत असल्याचे प्रतिपादन अंमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे मुख्य प्रशिक्षक कैलास चौधरी यांनी केले.
सटाणा तालुक्यातील विरगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रशिक्षक कैलास चौधरी पाण्याचे महत्व सांगताना बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, क्षमता बांधणी तज्ञ तथा जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या माधवी पोळ यांनी जलजीवन प्रशिक्षणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रशिक्षक बापुराज खरे, शीतल राहाडे, आकांक्षा कोठावदे, ब्राह्मणगावच्या माजी सरपंच मनीषा खरे यांनी पाण्याचे महत्व सांगितले. श्री चौधरी पुढे म्हणाले की, अनेक ठिकाणी पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनत चालला असून तहान भागवायला पाणी नसल्याने जनता होरपळत आहे. यावर वरवरचे उपाय करून भागणार नाहीतर पावसाचा प्रत्येक थेंब अडविणे व तो जमिनीत जिरविण्यासह कूपनलिका खोदून जमिनीची होणारी चाळण थांबवावी लागेल असे उपाय केल्याशिवाय भविष्यात पाण्याची समस्या भेडसावणार नाही. पाणी अडवा पाणी जिरवा हे ब्रीद वाक्याप्रमाणे पाणी हेच जीवन असून पाण्याचा काटकसरीने वापर करा नाहीतर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.


