जायखेडा, डांगसौदाने येथे जलजीवन मिशनअंतर्गत राष्ट्रविकास अँग्रो संस्थेच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन
इगतपुरी ( प्रतिनिधी )
भूजलाची घटती पातळी चिंताजनक बनत चालली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जनतेला पाणी टंचाईला तोंड दयावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. पाणी बचतीसाठी लोकसहभाग वाढवून पाण्याच्या वापराबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. संभाव्य समस्या लक्षात घेऊन आता प्रत्येकाला पाणी बचतीसाठी कठोर धोरण अवलंबवावे लागणार आहे. असे प्रतिपादन अंमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे मुख्य प्रशिक्षक कैलास चौधरी यांनी केले. सटाणा तालुक्यातील जायखेडा, डांगसौंदाणे येथे जलजीवन मिशनअंतर्गत राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रशिक्षक कैलास चौधरी पाण्याचे महत्व सांगताना बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, क्षमता बांधणी तज्ञ तथा जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या माधवी पोळ यांनी जलजीवन प्रशिक्षणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बापूराज खरे, राधिका दिवटे यांनी जलजीवन मिशनची माहिती सांगितली. पावसाचे पाणी जागोजागी अडवून पुनर्भरण करणे गरजेचे असून पाणी जमिनीत जिरल्यानंतर आसपासच्या भागातील विहिरीच्या पाण्यात वाढ होते. प्रत्येक वर्षी निसर्ग बदलत आहे. पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. प्रत्येक वर्षी मागील वर्षे चांगले होते अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाला आपली मानसिकता बदलावी लागणार असल्याचे मुख्य प्रशिक्षक कैलास चौधरी यांनी सांगितले.


